सांगली: राज्यात यापूर्वी असणारं महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्य सरकार चालणार नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त अडीज वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते.
या संमेलनाचं उद्घाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
जो पर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तो पर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही असं सांगून आठवले पुढे म्हणाले, ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’ अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली.
साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहिती ही केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.