मुंबई : संजय राऊत आणि राणे कुटुंब यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. यादरम्यान आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असे वक्तव्य त्यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहिला नसल्यानं आता संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.तसेच ते लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. या प्रवेशाबाबत संजय राऊत यांच्या पवारांसोबत अनेक बैठका झाल्याचा दावादेखील नितेश राणे यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले नितेश राणे?
राज्यात पुढच्या आठवड्यात एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या शरद पवारांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता राहिला नसल्याने संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करेल असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
तसेच नितेश राणे पुढे म्हणाले संजय राऊत अजित पवारांवर टीका करत आले आहेत. संजय राऊत यांची अशी अट आहे की, ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडतील त्यादिवशी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असेदेखील नितेश राणे म्हणले आहेत. त्यामुळे आता नितेश राणे यांनी केलेला दावा खरा ठरतोय का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर त्यांनी केलेला दावा खरा ठरला तर हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाईल.