विशेष संपादकीय : 07 जिल्ह्यांवर मंत्रिपदांची खैरात; 15 जिल्ह्यांत संक्रांत! मिसाळ, जैस्वालांची भलामण!

412 0

विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी का होईना मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं; पण मंत्रिपदांचं वाटप करताना महायुती सरकारकडून न्याय-अन्यायाची भूमिका पाहायला मिळाली. एकूण 36 पैकी 21 जिल्ह्यांमध्ये 42 मंत्रिपदं वाटून उर्वरित 15 जिल्ह्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या गेल्या. 21 पैकी 07 जिल्हे तर असे आहेत ज्यांना खैरात वाटल्यासारखी मंत्रिपदं वाटण्यात आली.

सरकारचा इशारा, ‘आता तुम्ही आराम करा…’

महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी जातीजमातीचा समतोल राखताना एकीकडं जुन्या-जाणत्या, अनुभवी ज्येष्ठ नेत्यांना मात्र घरचा रस्ता दाखवला, तर दुसरीकडं अगदी नवख्या चेहऱ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घेतली. यामुळं सरकारमधील प्रत्येक पक्षात ‘कही खुशी कही गम’ असं वातावरण पाहायला मिळालं. भाजपनं सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण यांना डच्चू दिला, तर शिवसेनेनं तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. तिकडं राष्ट्रवादीनं तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना ‘आता तुम्ही आराम करा’, असं थेटच सांगितलं. कायद्यानुसार, 43 मंत्रिपदांची तरतूद असूनही 42 मंत्रिपदांसाठी शपथविधी सोहळा पार पडला मग उरलेलं एक पद नेमकं कुणासाठी राखून ठेवण्यात आलंय यावरून आता चर्चा सुरू झालीये. नव्या-जुन्या चेहऱ्यांचं मिश्रण करता करता तिन्ही पक्षांची चांगलीच दमछाक झाल्याचं यातून दिसून आलं.

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रावर सरकार मेहरबान!

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर महायुती सरकार चांगलंच मेहरबान झाल्याचं या मंत्रिमंडळ विस्तारातून दिसून आलं. कोकणास उपमुख्यमंत्रिपदासह 09 कॅबिनेट आणि 01 राज्यमंत्रिपद देताना पालघर जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. वास्तविक पाहाता पालघर जिल्ह्यातील एकूण 06 पैकी 05 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रास उपमुख्यमंत्रिपदासह 09 कॅबिनेट आणि 01 राज्यमंत्रिपद देताना सांगली व सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. वास्तविक पाहाता सांगली जिल्ह्यातील एकूण 08 पैकी 05 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. सोलापूरच्या बाबतीतही तसंच! सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 पैकी 05 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. म्हणजेच सांगली, सोलापुरातील मिळून एकूण 19 जागांपैकी 10 जागा जिंकूनही या दोन्ही जिल्ह्याच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलं नाही.

उत्तर महाराष्ट्रावर मंत्रिपदांचा वर्षाव; नंदुरबारात ‘दुष्काळ’!

उत्तर महाराष्ट्रास 08 कॅबिनेट मंत्रिपदं देताना नंदुरबार जिल्ह्याला मात्र मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. वास्तविक पाहाता नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 04 पैकी 03 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत.

विदर्भात 07 जिल्ह्यांत 23 जागी महायुती; मंत्रिपदं शून्य!

विदर्भाला मुख्यमंत्रिपदासह 05 कॅबिनेट आणि 03 राज्यमंत्रिपदं देताना पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, वाशिम, अकोला या एकूण 07 जिल्ह्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. वास्तविक पाहाता या 07 जिह्यांतील एकूण 32 पैकी 23 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत.

मराठवाड्यात नांदेडसह 04 जिल्ह्यांना ‘नो’ मंत्रिपद!

मराठवाड्याला 05 कॅबिनेट आणि 01 राज्यमंत्रिपद देताना नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव या 04 जिल्ह्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. वास्तविक पाहाता या 04 जिह्यांतील एकूण 21 पैकी 19 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. यातील नांदेड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा महायुतीला मिळून देखील या जिल्ह्यांच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलं नाही.

राज्यमंत्रिपदं देऊन मिसाळ, जैस्वालांची भलामण!

रविवारी (ता. 15 डिसेंबर) नागपुरात पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 33 जणांना कॅबिनेट, तर 06 जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. पंकज भोयर (वर्धा – भाजप), मेघना बोर्डीकर (जिंतूर, परभणी – भाजप), इंद्रनील नाईक (पुसद, यवतमाळ – राष्ट्रवादी) आणि योगेश कदम (दापोली, रत्नागिरी – शिवसेना) या चौघांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं इथपर्यंत ठीक होतं. कारण, या चौघांची आमदार म्हणून ही दुसरीच टर्म आहे. मात्र, आशिष जैस्वाल आणि माधुरी मिसाळ यांना त्यांच्या श्रेष्ठतेनुसार कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रिपद देऊन भलामण करण्यात आली. शिवसेनेचे विद्यमान आमदार आशिष जैस्वाल 2014 चा अपवाद वगळता 1999 पासून 05 वेळा रामटेक (नागपूर) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तिकडं भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ 2009 पासून सलग 04 वेळा पर्वती (पुणे) विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

एकूणच काय, तर महायुती सरकारकडून एखाद्या जिल्ह्यास किंवा एखाद्या आमदारास मंत्रिपद देताना समतोल साधता साधता असमतोल ‘साधला’ गेल्याचं दिसून येतंय. ज्या जिल्ह्यांतील सर्वच्या सर्व जागा महायुतीनं जिंकल्या त्या जिल्ह्यांच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही, तर जे आमदार चार-चार, पाच-पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रिपदच नाही. याला म्हणतात,’पोटभर खालेल्याच्या तोंडात तुपाची धार, उपाशी असलेल्याच्या वाट्याला पुन्हा उपासमार!’

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, ‘TOP NEWS मराठी’

EDITORIAL: संपादकीय! काका-पुतण्या एक झाले तरकुणाचे काय गेले?

https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/

Share This News
error: Content is protected !!