मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. यामध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता राखली आहे. भाजपचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीवरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील कर्नाटकाच्या निवडणुकीवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
जितेंद्र आव्हाडांनी कर्नाटकच्या निवडणुकीवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये “महाबीर बिक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी..!” हनुमान चालिसाचे एक कडवे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी या कडव्याचा अर्थदेखील सांगितला आहे. “महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत. ते दुर्जनांचं निराकरण करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात. थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झालीय.
काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता.
परंतु खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये.
हनुमान चालिसा मध्ये एक कडव आहे.…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2023
देशभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. कर्नाटकातील काँग्रेसचा विजय हा 2024 च्या विरोधकांच्या विजयाची नांदी आहेत अशा प्रतिक्रिया देशभरातून येत आहेत.