मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु जागा वाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटताना दिसत नाही. राज्यात सध्या अशा 10 जागा आहेत ज्या जागांसाठी युती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. आता या 10 जागा कोणत्या त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
1) सांगली
सांगली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ मानला जातो. मागच्या दोन लोकसभा निवडणुका सोडल्यास त्याआधी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलं आहे. मात्र या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर केलं. दुसरीकडे काँग्रेसनेही या जागेवर दावा सांगितल्यामुळे माजी खासदार प्रतीक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे. सांगलीत शिवसेनेची ताकद नसताना ही जागा महायुतीच्या पारड्यात पडण्याची शक्यता असल्यामुळे या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार द्यावा अशी स्थानिक नेत्यांची इच्छा आहे.
2) रामटेक
ही जागा सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी या जागेसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र भाजपही जागेवर दावा सांगत आहे. भाजपकडून अरविंद गजभिये यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र तुमाने यांना उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे या जागेचाही तिढा सुटताना दिसत नाही आहे.
3) दक्षिण मध्य मुंबई
दक्षिण मध्य मुंबईत विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच त्यांच्यावर त्यांचेच काही शिवसैनिक नाराज असल्याच्या चर्चांमुळे या जागेची महायुतीत सामील होणाऱ्या चौथ्या भिडूने म्हणजेच मनसेने मागणी केली आहे. या जागेवर बाळा नांदगावकर किंवा मग अमित ठाकरे यांना उमेदवारी द्यावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी देण्याची ठाकरे गटाची इच्छा असून मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या सुद्धा याच जागेसाठी आग्रही आहेत.
4) उत्तर पश्चिम मुंबई
या ठिकाणी ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचेच वडील आणि शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे इच्छुकांच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याच जागेवर आता प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा महायुतीकडून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण दुसरीकडे काँग्रेसकडून संजय निरुपम हे सुद्धा याच जागेसाठी इच्छुक आहेत.
5) भिवंडी
भिवंडीतील जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. काँग्रेसचे दयानंद चोरगे हे या जागेसाठी इच्छुक आहेत मात्र महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यापुढे त्यांच्या ताकदीचा उमेदवार असायला हवा, यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना स्वतः या जागेवर दुसरा उमेदवार देण्यासाठी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.
6) दिंडोरी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या फॉर्मुलानुसार ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे मात्र या जागेवर महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा दावा सांगितलाय.या ठिकाणच्या विद्यमान खासदार भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी चे भास्कर भगरे यांच्या नावाची चर्चा आहे तर कम्युनिस्ट पक्षाचे जे. पी गावित हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत.
7) माढा
या जागेवर महायुतीतर्फे विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यातच आता रासप चे महादेव जानकर यांना या जागी उमेदवारी देण्याच्या विचारात खुद्द शरद पवार असल्याचं बोललं जात आहे.
8) सातारा
ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. पण या जागेवर भाजपला उदयनराजे भोसले यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यामुळे कदाचित भाजप आणि अजित पवार गट यांच्यात माढा आणि साताऱ्याच्या जागेवर अदलाबदली होऊ शकते.
9) अमरावती
या जागेवर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र राणांच्या नावाला आनंदराव अडसूळ यांनी कडाडून विरोध केलाय. त्यामुळे ही जागा भाजप आणि शिंदे गटाच्या संघर्षात अडकलेली आहे.
10) रत्नागिरी
रत्नागिरीच्या जागेवर महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे सुद्धा या जागेवर लढण्यास इच्छुक आहेत.
या दहा जागांच्या वाटपाचा तिढा अनेक दिवसांपासून सुटताना दिसत नाहीये. वारंवार चर्चा बैठका करूनही उमेदवार निश्चित होत नाहीयेत. प्रत्येकच जागा जिंकणं हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी महत्त्वाचं झालंय. एकापेक्षा जास्त इच्छुकांची संख्या असल्यामुळे कोणा एकाला तिकीट दिल्यास दुसऱ्याची नाराजी ओढवून घेणं कोणत्याच पक्षाला पेलवणार नाही. त्यामुळे कमीत कमी रिस्क घेऊन निवडून येण्याची हमी असलेलाच उमेदवार देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता या जागांचा तिढा सोडण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला कधीपर्यंत यश येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार! शिवतारें आपल्या निर्णयावर ठाम
Amravati News : अमरावतीमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; 20 जण जखमी
Delhi Crime Video : दिल्ली हादरली ! भरदिवसा माथेफिरूने तरुणीवर केले चाकूने सपासप वार
Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर