धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, मात्र अजूनही आरोपींना अटक झालेली नाही. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis)जागे आहेत की झोपलेत? असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे.
आज धाराशिव मध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी धाराशिवमधील हा गंभीर प्रकार सांगत गृह खात्यावर टीका केली.
मनोज जरांगे म्हणाले, ‘काय चाललंय काय राज्यात ? धाराशिवमधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर हिंदी अत्याचार झाले. धाराशिवमध्ये आल्यावर मला ही घटना कळली. ही हरामखोर औलाद सरकारच्या लेकीवर अन्याय करत आहे. तरीही सरकार म्हणून तुम्ही काहीच करत नाही. असल्या सरकारवर आम्ही थुंकतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जागे आहेत काय ?’ असा आक्रमक प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भाष्य केलं. ‘मुख्यमंत्री साहेब, या समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लागेल आणि कुणीही आरोपी सुटणार नाही, असा तुम्ही कुटुंबियांना शब्द दिला आहे. जर या शब्दात बदल झाला, काही दगाफटका झाला तर तुमच्या सरकारचा कार्यक्रम केलाच म्हणून समजा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तरीही राज्य बंद करू.’ या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा केला आहे.