मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून टीका केली जात आहे. यादरम्यान मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली आहे. “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा आरक्षण हिसकावले गेले. त्यांनी कोर्टात प्रखरपणे बाजू मांडली. ते सूडाने पेटलेला होते. आरक्षणामुळे जसे यांचे काही प्रचंड नुकसान होणार आहे. त्यांची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होता. ज्यांनी कोणी हे केल ते कमी झाले. याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती,” असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली.