आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

#EKANATH SHINDE : “बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे…!” निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया !

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले कि, “लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो”, अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली. “लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असतं. आज सत्याचा विजय आहे. शिवसेनेने जो संघर्ष केला त्याचा हा विजय आहे”, असं देखील एकनाथ शिंदे यांवेळी म्हणाले.

“बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांशी एकरुप झालेल्या आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिक यांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आमचं सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.