मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) राज्य सरकारला दिले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत परिस्थिती जैसे थे राहील असे हायकोर्टाने म्हटले आहे. 21 ऑगस्टला या प्रकरणी अंतिम सुनावणी पार पडणार आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारला याविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ही 21 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. त्याचबरोबर न्यायालयाने राज्य सरकारला त्यांचं मत 10 दिवसांत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.