मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत धुळीमुळं मोठं प्रदूषण होत आहे. त्याच त्या गाईडलाईन काढल्या जात आहेत. कन्स्ट्रक्शन साईटवरून येणाऱ्या धुळीवर कोणतंही नियंत्रण नाही. 24 पैकी 15 वॉर्डमध्ये वार्ड ऑफिसर नाही, परीक्षा होऊन निकालही लागला पण नियुक्त्या खोक्यांसाठी रखडल्या असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारला लगावला आहे.
आदित्य ठाकरेंनी दिला इशारा
आमचं सरकार लवकरच येईल, आमचं सरकार ज्यांनी मुंबईला लुटलं त्यांना जेलमध्ये टाकरणारच असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. मात्र त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता ? हे लवकरच आपल्याला समजेल. तसेच काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये पूल पडल्याची दुर्घटना समोर आली होती. मात्र या सरकारने एवढं होऊनदेखील हा पूल बांधणाऱ्यालाच रस्त्याचे कंत्राट दिले. 2021 -22 मध्ये सुरू झालेली कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत. 2500 कोटींची कामं अशीच पडून आहेत. ऑक्टोबर निघुन गेला नोव्हेंबर सुरु होईल मग ही काम कधी पूर्ण होणार? या कामाला सुरुवात कधी होणार असा सवालदेखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.