वारकरी,विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023). आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023) दिवशी वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठोबाचं ‘याचि देहि याचि डोळा’ दर्शन घेता येतं. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार,आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो. पण कोणत्या वारकऱ्याला मान द्यायचा हे कसं ठरतं?कोण ठरवतं?
1973 पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते. त्यांच्यासोबत हे वारकरी दांपत्य उपस्थित असतं. हे मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीला असतो. विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते. आषाढीच्या आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता दर्शन रांग थांबवली जाते. दर्शन रांग जिथे थांबवली जाते तिथे पती-पत्नी कोण आहेत याचा शोध घेतला जातो. पहिलं दांपत्य मिळाल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का याची विचारणा केली जाते. तुळशीची माळ गळ्यामध्ये असल्यास त्या वारकरी दाम्पत्याची मानाचा वारकरी म्हणून निवड केली जाते. शिवाय मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कारही केला जातो. ज्यावेळी मुख्यमंत्री मंदिरात दाखल होतात त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते. मानाच्या वारकऱ्याची निवड झाल्यानंतर हे वारकरी जोडपं मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजा करत असतात. शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी दाम्पत्याचा सत्कार केला जातो. तसंच मानाच्या वारकऱ्यांना एक वर्षाचा एसटीचा प्रवास मोफत दिला जातो.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा केव्हापासून आणि कशी सुरु झाली
ब्रिटिशांच्या काळात (Ashadhi Ekadashi ) आषाढी एकादशील हिंदू कलेक्टर किंवा प्रांत अधिकारी यांना शासकीय पूजेचा मान दिला जायचा. त्या काळात ब्रिटिशांकडून आषाढी एकादशीसाठी दोन हजार रुपये अनुदान दिले जायचे. हा प्रकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत चालू होता. नंतर महाराष्ट्रातील मंत्री येण्यास सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीला येऊन पहिली पूजा केली तसेच त्यांनी ब्रिटिशांपासून सुरू असलेले 2000 रुपयांचे अनुदान 20 हजार केले.त्यानंतर वसंतदादा पाटील पंढरपुरात आले आणि त्यांनी पूजा केली. त्या काळात यात्रेकरूंना यात्राकर लावला जायचा. वसंतदादांनी तो यात्राकर पंढरपूरात येताच रद्द केला. पंढरपूरसह आळंदी देहूचा देखील यात्राकर रद्द केला.
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा सुरू झाली. मंत्री यायचे आणि पूजा करायचे; त्यामुळे वारकर्यांना खूप वेळ उभे राहावे लागत होते. म्हणूनच मनोहर जोशी यांनी हा निर्णय घेतला. कोण पूजा करणार, यावरून वाद व्हायचे. या सर्व गोष्टी लक्षात घेत मनोहर जोशींनी मुख्यमंत्र्यांनीच पूजा करण्याची प्रथा सुरू केली. यंदाही विठ्ठलाची महापूजा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडली. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि सौ. मंगल भाऊसाहेब काळे या अहमदनगरच्या शेतकरी दाम्पत्याला मान मिळाला.