मानसिक आरोग्य : अल्पवयीन मुलांवरील वाढते बलात्कार ; पालकांसोबत संवाद अधिक महत्त्वाचा…!

214 0

पुण्यामध्ये आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि अगदी देशभरातील प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी काळजी करत असून गांभीर्याने विचार देखील करत आहेत. असं असताना मुलांना सर्वात चांगल्या शाळेत पाठवण्याच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण जबाबदारी ही शाळा प्रशासनाचीच आहे का ? असा प्रश्न हमखास पालकांनी स्वतःला विचारणे आवश्यक आहे.

शालेय विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील विनयभंग आणि बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर ऐकिवात येत आहेत. असं असताना मुलांची सुरक्षा कमी पडते आहे,की संवाद… हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे.

शाळेमध्ये गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत असतो. ही स्पर्धा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या जीवावर देखील बेतली आहे. पालकांच्या विद्यार्थ्यांकडून यशस्वी होण्याच्या वाढत्या अपेक्षा,शाळांकडून आखले जाणारे वेगवेगळे अभ्यासक्रम,आणि विद्यार्थ्यांच्या मधील गुणांची स्पर्धा… यामध्ये मुलांची,त्यांच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीने पालकांनी करून घ्यावयाचा संवाद हा नक्कीच कमी पडतो आहे.

आडनानीड वयामध्ये वाढणारे आकर्षण कुतूहल यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकीची पावले देखील उचलतात. त्याला भर असते ती भीती,बदनामी यांची. त्यामुळे आपल्या मुलांशी कोणत्या प्रकारचा संवाद कोणत्या वयामध्ये करायला हवा,याचा अधिक विचार पालकांनी करायला हवा. त्यांच्या अभ्यासक्रमाचा आणि त्यांच्या गुणांचा विचार शाळा प्रशासनाला करू द्यावा.

1.पालकांनी आपल्या पाल्याशी मित्र मैत्रिणीचे नाते प्रस्थापित करायला हवे .
2. आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत. तो किंवा ती कोणासोबत अधिक बोलते किंवा बोलतो याविषयी मोकळेपणाने संवाद करा.
3. चांगले वाईट हे त्यांना स्वतःला समजू शकेल अशा पद्धतीने उदाहरण देऊन समजावून सांगा. या वयामध्ये चुकीच्या पद्धतीने धाक लावण्याचा प्रयत्न मुलांना हमखास वाईट मार्गावर नेण्यास प्रवृत्त करतो.
4. मुलाची मैत्रिणीशी असलेली जवळीक किंवा मुलीची मित्राशी असलेली जवळीक ही वाईट नाही,पण नात्यांमध्ये योग्य अंतर असणे कसे महत्त्वाचे आहे,हे देखील मुलांना समजून सांगण्यासाठी आधी तुमच्या मुलाशी चांगले नाते निर्माण करा. जेणेकरून त्यांच्या मनातील प्रत्येक भावना तो तुमच्यासोबत देखील मोकळेपणाने शेअर करू शकेल.
5. जेव्हा तुम्ही पाल्याशी थेट संवाद साधाल,त्या वेळीच तुमच्या प्रत्येक शब्दाला देखील पाल्य विचारात नक्की घेईल. त्यासाठी तुमच्या पाल्याच्या भावना,शारीरिक पातळी,शारीरिक गरजा यांचा विचार पालकांनी आधी स्वतः करायला हवा.
6. पाल्याचे वय लक्षात घेता त्यांच्याशी योग्य भाषेमध्ये शारीरिक आकर्षण या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा शारीरिक आकर्षण हा मानवी स्वभाव आहे. परंतु आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन तुम्हीच करू शकता.
7. पाल्यांसमोर वाईट शब्द आधी स्वतः वापरणे टाळा. त्यानंतर अश्लील शब्दप्रयोग,अश्लील शिवीगाळ याचा दूरवर होणारा वाईट परिणाम, संभाव्य कायदेशीर कारवाई याविषयी देखील त्यांना शिकवण द्या. यामधून तुम्ही चांगली नवीन पिढी घडवाल.
8. तुमच्या पाल्याला घरापासून शाळेपर्यंत, शाळेमध्ये आणि पुन्हा शाळेपासून घरापर्यंत कोणकोणत्या व्यक्ती भेटतात ,कोणा कोणाशी त्यांचा संबंध येतो याविषयी माहिती असू द्या.
9. शाळेला नियमित भेट द्या. शाळेतील शिक्षकांशी मुलांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतून काय खबरदारी घेतली जाते. याविषयी माहिती घेत रहा.
10. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना निर्णय घेण्याची शिकवण द्या. आपले चांगले-वाईट काय आहे,याचे ज्ञान त्यांचे त्यांना द्या. जेणेकरून कोणत्याही संकटात स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्य निर्णय घेऊन स्वतः सक्षम बनतील.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!