पुणे : अहमदपूर तालुक्यातील मौजे नागठाणा येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध गायक प्रमोद श्रीहरी लोखंडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या माघारी आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या या अचानक झालेल्या निधनामुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मौजे नागठाणा सारख्या खेडेगावांमध्ये जन्म झालेल्या आणि कला शाखेतील पदवीधर असलेल्या प्रमोद लोखंडे यांना लहानपणापासून गायनाची प्रचंड आवड होती. त्यांना या गायनाच्या कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांनी वयाच्या 5 व्या वर्षांपासून गायनाला सुरुवात केली आहे. आपल्या वेगळ्या शैलीतील गायकीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या प्रमोद लोखंडे यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात हजार पेक्षा अधिक भीम गीत गायनाचे कार्यक्रम केले. त्यांचे हे कार्यक्रम सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. तसेच ध्वनिमुद्रण करीत असलेल्या काही नामांकित कंपन्यां द्वारे त्यांचे गीत ध्वनिमुद्रित झाले आहेत. नका करु नाद जयभीमवाल्यांचा हे त्यांचे गाणे प्रचंड गाजले होते.