मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.
भालचंद्र कुलकर्णी गेले पाच दशकं मनोरंजन विश्वात सक्रिय होते. पाच दशकांच्या या बहारदार कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘पिंजरा’, ‘मुंबईचा जावई’, ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘सोंगाड्या’, ‘नवरा नको गं बाई’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘जावयाची जात’ अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या सहाय्यक भूमिकांसाठी ते नेहमीच लक्षात राहिले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून काहीसे दूर होते.
कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. रा. छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही अनेक मालिकेतही त्यांनी काम केले होते. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या कोणताही कोणतीही भूमिका दिली तरी ती अतिशय परफेक्ट करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.