मुंबई : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. या प्रकरणावर आता मनोरंजन क्षेत्रातील मंडळीदेखील आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर रील शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे. सध्या हे रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
अतुल कुलकर्णीने कवितेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. महात्मा गांधी यांची हत्या झाली असली तरी ते आपल्यातून गेलेले नाहीत. आजही त्यांची अनेकांना आठवण येते, असं त्यांनी या रीलच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे. अतुल कुलकर्णी यांचं अस्वस्थ करणारं रील सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
अतुल कुलकर्णी नेमके काय म्हणाले रीलमध्ये ?
तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं!!
गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.
तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू…
असं नसतं करायचं, मारलं की मरायचं!
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस
बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं
मारलं की निमुट मरायचं असतं
तू ना… एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ
ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो.
जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.
मारलं की निमूट मरायचं असतं… पुढच्या वर्षी नक्की मर..
अतुल कुलकर्णी यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ते नुकतेच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसले होते. या सीरिजचे सर्व सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. अतुल कुलकर्णीने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.