मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या (Karnatak Election) 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदार प्रक्रिया पार पडली त्यानंतर आज मतमोजणी संपन्न होत असून भाजपा कर्नाटकातील सत्ता गमावताना दिसत आहे. काँग्रेसने (Congress) भाजपचा (BJP) सुपडा साफ केला आहे. आत्तापर्यंतच्या कलांनुसार काँग्रेसने स्पष्टपणे बहुमत मिळवले आहे. एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा दावा खरा ठरत आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला का नाकारलं, याची काही कारणे समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 42 रॅलीसह दोन दिवस रोडशो झाले. मोदींसारखे नेतृत्वही निवडणुकीत उतरलं होतं. तरीही भाजपचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाची कारणे पुढीलप्रमाणे :
1) येडीयुरप्पा साईडलाईन
कर्नाटकात भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्यात ज्याचा मोठा वाटा राहिला त्या बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांना भाजपने बाजूला ठेवलं. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांची तिकीटं भाजपने कापली. त्यांनी काँग्रेससोबत जात निवडणुकीच्या मैदानात उतरले. हे तिघेही लिंगायत समाजाचे बडे नेते आहेत. त्यांना बाजूला करणं भाजपला महागात पडलं.
2) राजकीय समीकरणं जुळवण्यात अपयशी
भाजप जातीय समिकरणं जुळवून आणण्यात अयशस्वी ठरलं. लिंगायत, दलित, आदिवासी, ओबीसी, वोक्कलिंगा या समाजाला जवळ करण्यात भाजपला यश आलं नाही. तर दुसरीकडे काँग्रेस मुस्लिम, दलित ओबीसी समाजाची मनं जिंकण्यात यशस्वी झाली. त्यामुळे त्यांचा विजय झाला.
3) मजबूत चेहऱ्याचा अभाव
कर्नाटकात भाजपने मागच्यावेळी बी. एस. येडियुरप्पा यांना डावलत भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केलं. पण बोम्मई कर्नाटकच्या जनतेवर आपल्या कामाची विशेष छाप पाडू शकले नाहीत. आताही भाजपने बोम्मई (Bommai) यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढली. परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसतोय. भाजप पराजयाच्या जवळ दिसत आहे.
4) धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा
कर्नाटकात भाजपने हलाल, हिजाब, अजान या सारखे मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. काँग्रेसने बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालण्याचं अश्वासन दिलं. तर भाजपने बजरंग दलाचा थेट बजरंग बलीशी संबंध जोडला. अन् हा थेट बजरंग बलीचा अपमान असल्याचं म्हटलं हाच धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कर्नाटकमधील जनतेच्या पचनी पडल्याचा दिसत नाही.