केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं की, हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे.
तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.
सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत.
केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे असल्याचं म्हणत अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.