पुणे : चंद्रपूरचे (Chandrapur) काँग्रेसचे (Congress) खासदार बाळू धानोरकरांचं (Balu Dhanorkar) आज पहाटे निधन (Pass Away) झालं. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यासोबतची एक आठवण शेअर केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
“2019 मध्ये एवढी जबरदस्त भाजपाची लाट असताना, काँग्रेसची एकही जागा नसताना त्यांच्या प्रयत्नांमळे त्यांची जागा निवडून आली. उपमुख्यमंत्री होतो तेव्हा ते स्वत: आणि त्यांच्या पत्नी अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची कामे घेऊन यायचे. पाठपुरावा करणारे कणखर नेतृत्त्व होतं ते. सर्वसामान्य जनतेशी अतिशय घट्टपणे नाळ जुळलेला नेता, अशी त्यांची ओळख होती. परंतु एका आजाराने ग्रासलं, दिल्लीसारख्या ठिकणी नेऊन सुद्धा काळाच्या नियतीसमोर कोणाचं चालत नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली.
“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा त्या भागात अतिवृष्टी झाली होती. तेव्हा त्यांच्या भागाचा पाहणी दौरा केला होता. अतिशय मनमिळावू त्यांचा स्वभाव होता. आमचं चंद्रपूरला कार्यालय नव्हतं. तेव्हा त्यांनी एका मित्र पक्षाचं कार्यालय बांधण्याकरता जागा देण्याचा दिलदारपणा त्यांच्याकडे होता,” असे अजित पवार म्हणाले आहेत. बाळू धानोरकरांच्या जाण्याने “कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे तसेच मविआचा खंदा समर्थक सोडून गेला अशी खंतदेखील अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.