ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 3 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. या प्रकरणावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणावरून मुख्यंत्र्यांसह सरकारची कानउघडणी केली आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
“ही अतिशय चिंताजनक प्रकारची गोष्ट आहे. हा प्रकार ठाण्यात घडला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येही सार्वजनिक रुग्णालयात या प्रकारच्या घटना होत असतील तर राज्य कोणत्या दिशेने जात आहे याचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे,” असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
सरकार जोरदार टीका
“दोन पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्यावर परदेशातून माल आणण्याची भूमिका केंद्र सरकार घेते. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी त्याला यातना कशा देता येतील हीच भूमिका राज्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत आयात करणे हे शेतकऱ्यांना दुःख पोहचवण्या सारखं आहे,” अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारवर केली आहे.