अमरावती : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी 9 दिवस आमरण उपोषण केलं. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आणि सरकारला दोन महिन्यांचा वेळ वाढवून दिला. यावेळी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली होती. या आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू ?
लोकसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे. सरकारने जरांगे यांना दिलेला शब्द पाळला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सरकार विरोधात ताकदीने उभं राहू असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू हेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत भीती व्यक्त केलीय.
तारखेचा जो घोळ होता त्याबाबत जरांगे पाटलांशी बोललो होतो. तीन महिने वेळ देण्यास सांगितलं होतं. पण आता लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटायला हवा असंही बच्चू कडू म्हणाले. सरकार 2 जानेवारी असं म्हणत आहे पण दिवाळीच्या सुट्ट्या जातायत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होईल. सरकारने 24 तारीख समजून काम केलं तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.