बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मात्र अजूनही सरकारकडून या आरक्षणावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. सरकारला वेळ लागत असल्याने राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी तोडफोड, जाळपोळ करायला सुरुवात केली आहे.
बीडमध्ये आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक केली, घर, कार्यालय पेटवून देण्यात आलं. तर बस स्थानकातील ६० बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर बीड शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेटची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर पंढरपूरमध्ये देखील या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. यामध्ये पंढरपूर जवळच्या भंडीशेगाव येथे रात्री पिंपरी चिंचवड आगाराची बस पेटवण्यात आली आहे. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
आता या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. जाळपोळ, तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जाळपोळीच्या घटनानंतर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बीड जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आहे. याचबरोबर विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारादेखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.