मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Rain) झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने (Maharashtra Rain) रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणात वाशिष्ठी, जगबुडी नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाचा वाढता जोर बघता रायगड, चिपळूण, पालघर या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफची 6 पथके तैनात करण्यात आली आहेत.
खेड – रत्नागिरीत पावसाचा हाहाकार
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला असून जगबुडी नदीच्या पुराचे (Maharashtra Rain) पाणी खेड शहरांमध्ये शिरले आहे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे या ठिकाणी काही अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य मदत ग्रुप आणि खेड नगरपालिकेच्या रेस्क्यू टीम च्या माध्यमातून केले जात आहे. या घटनेमुळे खाडीपट्टा विभागातील सुसरी, खारी, नांदगाव, कोरेगाव, संघट, बहिरवली, रजवेल, पन्हाळजे या मुख्य गावांसह 25 ते 30 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.
अजित पवार यांनी घेतला आढावा
कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.