मुंबई : अवघ्या काही दिवसांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या गणेशोत्सवानिमित्त सगळीकडं लगबग सुरु झालेली आहे. याची सगळी तयारी अंतिम टप्प्यात आली असताना पाऊस (Maharashtra Rain) या सगळ्यामध्ये खोळंबा करू शकतो. कारण, पावसानं गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोर धरला असून, पुढील 24 तासांसाठी पुणे, कोकण, ठाणे आणि पालघर भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस राज्यात पावासाचा जोर कायम राहणार असून, या धर्तीवर जवळपास 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे, नाशिक, साताऱ्यासह रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भातील अकोला, वाशिम, खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही अशीच परिस्थिती राहणार असून, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.