शिर्डी,अहमदनगर : “महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला नगण्य स्थान होते.फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते. काँग्रेसने आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकला आहे. काँग्रेसला राज्यात पूर्णपणे अनुलिखित करण्यात आले होते.”अशी घडाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्राला आता लोकांचं सरकार मिळालं असून,जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मागील अडीच वर्षात राज्याची अधोगती झाली. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विश्वासघाताने आलेले सरकार होते.” अशी टीका देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
यावेळी साईबाबांचे दर्शन घेऊन कोविडचा संपूर्ण नायनाट व्हावा राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साईबाबांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली असल्याचं विखे म्हटले आहेत.