पुणे : महाराष्ट्रातून मुलींच्या बाबतीत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या मार्च महिन्यामध्ये राज्यातील 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर मागच्या तीन महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 610 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. म्हणजेच रोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुलींचा समावेश आहे.
महिला अयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्यात की, राज्यात दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढत आहे. हि राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. या मुलींना नोकरी, लग्न, प्रेमाच आमिष दाखवून त्यांची दिशाभुल केली जाते आणि त्यांच्यावर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. यामुळे गृह विभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog@maharashtra_hmo @DGPMaharashtra pic.twitter.com/vr2QXqsXbX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2023
पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, अहमदनगरमध्ये सर्वाधिक प्रमाण
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. ज्यात मार्च महिन्याची आकडेवारी पाहिली असता, पुणे 228, नाशिक 161, कोल्हापूर जिल्ह्यातून 114, ठाणे 133, अहमदनगरमधून 101, जळगाव 81, सांगली 82, यवतमाळ 74 युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी आकडेवारी हिंगोली 03, सिंधूदुर्ग 03, रत्नागिरी 12, नंदूरबार 14, भंडारा 16 येथून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.