जालना : जालना (Jalna News) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. अंतरावली सराटी या ठिकाणी (Jalna News) हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.
या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला आहे. या सगळ्यामध्ये काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज अजून आक्रमक झाला आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या व्हॅन गावाबाहेर काढल्या.
या आंदोलनावर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
“मला जालन्यातून एक-दोन लोकांचे फोन आले. तिथे काय घडलं हे सांगितलं. तिथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी मनोज जरांगे यांच्याशी विचार विनिमय केला. त्या चर्चेत सर्व शांततेने झालं होतं. पण चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करुन त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यात त्या तरुणांवर प्रचंड लाठीहल्ला केला”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“एकदा तुम्ही चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण हल्ली विशेषत: सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रश्नांसंबंधित कोणताही प्रश्न असले तर ते रस्त्यावर आले तर बळाचा वापर ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल मनामध्ये जी भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. ते व्यक्त झालेले चित्र आपण जालन्यात पाहिले. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची, गृह खात्याची जबाबादारी घेणाऱ्यांची आहे, मी याचा तीव्र निषेध करतो. हे थांबवण्यासाठी त्या लोकांना तिथे जाऊन धीर द्यावं लागेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.