प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात एक वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असं इंदुरीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान याच काळात इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता.
नेमके काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशा वेळेला झाला तर अपत्ये रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वॉलिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.