बीड : काही दिवसांवर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे मुंडे बहिण- भाऊ यांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला आहे. 21 संचालकांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये विशेष बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही.
या निवडणुकीसाठी भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पाठोपाठ त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे व त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापंर्यत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात दाखल केले आहेत.
या निवडणुकीसाठी आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड, अजय मुंडे व इतरांचे अर्ज दाखल झाले आहेत, मात्र आमदार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल ने केल्यानं या निवडणुकीत संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे याचा परिणाम काय होतो हे येत्या निवडणुकीमध्ये दिसून येईल.