यवतमाळ : स्वातंत्र्याचा काळ उलटून 75 वर्ष पूर्ण होत आली मात्र यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील वाघद -कर्मळा या गावातील नागरिकांना अद्याप रस्ताही मिळाला नाही. आजही या दोन्ही गावांमध्ये ये-जा करण्यासाठी नदी पात्रातून नागरिकांना जीव मुठीत धरून कसा जीवघेणा प्रवास करावा लागतोय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट…
वाघद आणि कर्मळा या गावातील नागरिकांना नदी ओलांडण्यासाठी पुलाची व्यवस्था नाही. तुम्ही जी सांगळी बघताय तो आहे जंगली भोपळा. याच भोपळ्याच्या साहाय्याने नागरिक ये-जा करतात. चार भोपळयांच्या मदतीने त्यांना दोराच्या साहय्याने मजबूत बांधून घेवून या सांगळीवर दोन व्यक्ती बसून नदीपात्रातून ये-जा करतात.
याचं कारण म्हणजे वाघद गावातील नागरिकांची शेती कर्मळा गावात आणि कर्मळा गावातील नागरिकांची शेती वाघद गावात आहे. पावसाळ्यात शेती उपयोगी बी- बियाणांची ने-आण करण्यासाठी तब्बल पंधरा ते अठरा किलो मीटरचा फेरा मारून ये जा करावी लागतेय. अशा संघर्षमय परिस्थितीत पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
एकीकडे आपण प्रगत महाराष्ट्र म्हणतो मात्र याच महाराष्ट्रात चार भोपळ्यांना एकत्र जोडून त्यांच्या माध्यम्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे राजकीय भोपळे बहाद्दरांना कधी समजणार ?