कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये एका महिलेचा दगडानं ठेचून खून करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातील जवाहर नगर परिसरातल्या सरनाईक वसाहत या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मी विलास क्षीरसागर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
काय घडले नेमके?
शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून लक्ष्मी क्षीरसागर या आपल्या राहात्या घरातून बेपत्ता होत्या. लक्ष्मी क्षीरसागर या शहरातील रोहिदास कॉलनी इथे वास्तव्याला आहेत. कुटुंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर रात्री बाराच्या सुमारास नातेवाईकांनी राजाराम पुरी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
आज सकाळी पोलिसांना जवाहर नगर परिसरातील खुल्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता तो मृतदेह लक्ष्मी क्षीरसागर यांचाच असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचा दगडानं ठेचून खून करण्यात आला होता. त्यांची नेमकी कोणत्या कारणातून हत्या करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.