सोलापूर : सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. डोक्याला बांधलेले स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. नंदा भास्कर गरड (वय 61, रा. तांदळवाडी, ता. बार्शी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मळणी यंत्रात नंदा गरड यांचं डोके अडकून त्यांचा पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
भानुदास बापूराव गरड (वय 59) यांनी पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद देताना म्हंटले कि, 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी भास्कर गरड याच्या शेतात सोयाबीन मळणीसाठी यंत्र आले होते. त्यासाठी नंदा भास्कर गरड आणि त्यांचा मुलगा रामराजे असे तिघेजण स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केले.नंदा गरड या मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेले सोयाबीन पिकांचे दाणे गोळा करत होत्या. नंदा यांच्या डोक्यावर बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस हे ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रॉडला अडकले. त्यांचे डोकंही फिरत्या रॉडमध्ये अडकले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने नंदा यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे आणि पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर नंदा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल शब्बीर शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.