छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तिने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलले. ही घटना पिसादेवी परिसरामध्ये घडली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
अंजली पांडुरंग शेरे असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अंजली यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अंजली यांचा पांडुरंग ज्ञानोबा शेरे राहणार सेलू तालुका परभणी यांच्यासोबत 2018 साली विवाह झाला होता. अंजली यांना तीन वर्षाची मुलगी आहे. अंजली पाच महिन्याची गर्भवती होती.अंजलीला पती पांडुरंग घरगुती कारणावरून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. तसेच चरित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी अपमानित करत होता. दरम्यान 29 तारखेला अंजलीने आईला फोन करून सांगितले की, पांडुरंग म्हणत आहे की मुलगा झाला तर ठीक नाहीतर मी तुला सोडून दुसरे लग्न करेल अशी धमकी देत आहे. यामुळे मी आता जगणार नाही असं म्हणत तिने फोन कट केला.यानंतर तिने 30 तारखेला दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंजलीने आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवर माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे झालं आहे. मला आता सहन होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तुमचा विश्वास नाही. माझी पण इज्जत आहे. माझा पण स्वाभिमान आहे. किती दिवस माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करायचा. खरंच खूप थकले मी असा मजकूर लिहिला होता. या घटनेमुळे अंजलीच्या आई – वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी अंजलीच्या आईच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये पांडुरंग शेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.