छत्रपती संभाजीनगर : रविवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले होते. मिनी ट्रॅव्हल्सने समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला होता. दरम्यान आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोन आरटीओ अधिकारी आणि चालकावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गोणारकर अशी अटक करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावं आहेत. तर ब्रिजेश चंदेल असे चालकाचे नाव आहे. या आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून या अपघातात अजून काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
काय घडले होते नेमके?
रविवारी समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ भीषण अपघात झाला. समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून मिनी ट्रॅव्हलने धडक दिली. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले. दरम्यान आरटीओची गाडी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील असाच आरोप केला होता.