सातारा : खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. 12 रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात (Satara News) एका युवकाला धडक देऊन अर्टिगा कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या कारमधील 5 जणांचे प्राण वाचवले आहे.
काय घडले नेमके?
पुण्याहून डफळपूरला (ता. जत) निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (25) आणि अविनाश भाग्यवंत उबाळे 29) हे दोघे लघुशंकेसाठी कॅनॉलजवळ थांबले होते. तेव्हा पाठीमागून आलेली अर्टिगा कार (क्र. एमएच 12 टीवाय 1066) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने राहुल उबाळे यांना धडक देऊन कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. हा अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत कारमधील चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (वय 42), श्रीमंत शिंदे (वय 70), राजश्री श्रीपती शिंदे (वय 37), संकेत श्रीपती शिंदे (वय 13), संस्कृती श्रीपती शिंदे (वय 8, सर्व रा. अथनी, ता. बेळगाव, सध्या रा. पुणे) या पाच जणांना कारमधून बाहेर काढले.
दैव बलवत्तर म्हणून…! नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले 5 जणांचे प्राण pic.twitter.com/A9vqtgjyk5
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 13, 2023
या अपघातामध्ये कारने उडविलेले राहुल उबाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यासहित सर्वच अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादम्यान धोम -बलकवडी कॅनॉलमध्ये पडलेली कार वाहून जात असल्याची माहिती खंबाटकी घाटात पेट्रोलिंग करत असताना भुईंज महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे, हवालदार मनोज गायकवाड, हवालदार विकास कदम, विजय बागल यांना मिळाली. यानंतर त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी असणाऱ्या हवालदार मनोज गायकवाड आणि विकास कदम यांनी कॅनॉलमधील पाण्यात उडी घेऊन नागरिकांनासुखरूप बाहेर काढले. खंडाळा पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.