सांगली : सध्या राज्यात अपघातांचे (accident) प्रमाण खूप वाढले आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये 3 महिला,3 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या अपघातातील सर्व मृत व्यक्ती हे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. यादरम्यान हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपूर माहमार्गावरील वड्डी गावाच्या हद्दीत बोलेरो गाडी पोहोचली असता ,राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला आणि त्यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये बोलेरो गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. यामध्ये 7 जण जागीच ठार झाले आहेत,तर 1 तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
या अपघातातील जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.