पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्याच्या धायरी इथून जेजुरीला देवदर्शनासाठी गेलेल्या नवदाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांच्याबरोबर तरुणीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवदाम्पत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहिरीत पडल्याने हा अपघात झाला. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांच्यासोबत एक तरुणी रिक्षाने जेजुरीला निघाले होते. सासवडजवळ बोरगावकेमळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये रिक्षा कोसळली. यामध्ये नवदाम्पत्याचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संसाराला सुरुवात होण्याआधीच या नवदाम्पत्याचा दुर्दैवी शेवट झाला. रिक्षाचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला.
सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे ही घटना कोणाच्याच लक्षात आली नाही. या अपघातानंतर त्या नवविवाहित दाम्पत्याचा आणि रिक्षातील इतर व्यक्तींचा त्यांच्या कुटुंबीयांशी असलेला संपर्क तुटला होता. आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून वाचवा वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना विहिरीत दिसल्या. त्यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना दिली. यानंतर सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेत नवविवाहित जोडप आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात श्रावणी संदीप शेलार (वय 17 वर्ष), रोहित विलास शेलार (वय 23 वर्षे) वैष्णवी रोहित शेलार (वय 18 वर्षे) यांचा मृत्यू झाला तर आदित्य मधुकर घोलप (वय 22 वर्षे) शितल संदीप शेलार (वय 35 वर्षे) हे बचावले आहेत. सर्वजण पुण्यातील धायरी इथं धायरेश्वर मंदिर जवळ राहणारे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.