सातारा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Satara News) एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील (Satara News) बॉम्बे रेस्टॉरंटनजीक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा अचानक टायर फूटला आणि हा भीषण अपघात झाला.
काय घडले नेमके?
पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा टायर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून समोर कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की या गाडीत प्रवास करणाऱ्या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
निखिल श्रीकांत सवाखंडे (वय 30 वर्ष), प्रियांका निखिल सवाखंडे (वय 32 वर्ष), शशिकांत यदुनाथ सवाखंडे (वय 63 वर्ष) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत. या अपघातात तवेरा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.