जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नैराश्याच्या तणावातून आत्महत्या केली आहे. त्याने छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष वामन भावसार (वय 42) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून संतोष हे कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना संशय आला.यानंतर त्यांनी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांच्या घरात जाऊन पाहिले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर याची माहिती मृत संतोष यांच्या बहिणींना देण्यात आली. याची माहिती मिळताच त्यांच्या बहिणींनी एकच आक्रोश केला. संतोष भावसार रेणुका नगरात एकटे राहत होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून तीन मुलांसहित बेपत्ता आहे. संतोष प्लम्बिंगचे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.