नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आयुष ईश्वर सातपुडके (वय 22, भिवी, भिवापूर), आणि निखिल मुकुंद भगत (वय 25, नाड, ता.भिवापूर) अशी मृत तरुणाची नावं आहेत. मकरधोकडा तलावातील नगरपालिकेच्या पंप हाऊसजवळ ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
मृत आयुष सातपुडके आणि त्याचा चुलत भाऊ तसेच मृतक निखिल भगत आणि अनिकेत कांबळे हे चौघे सोमवारी दुपारी मकरधोकडा तलाव परिसरात आपल्या बाईकवर फिरायला गेले होते. यावेळी निखिल आणि आयुष यांना पाण्यात पोहण्याचा मोह अनावर झाला. यानंतर त्यांनी तलावाच्या काठावर कपडे काढले आणि पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र त्या दोघांनाही पोहाता येत नव्हते. तसेच तलावात किती पाणी आहे हे न कळल्याने दोघेही खोल खड्ड्यात पडले. हा प्रकार काही अंतरावर असलेल्या अन्य दोन मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती उमरेड पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच मकरधोकरा चौकीचे पोलिस कर्मचारी आणि उमरेड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दोन जिवलग मित्रांचा असा करुण अंत झाल्याने नागपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.