नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीच्या त्रासाने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. मृत तरुणाने नदीत उडी मारण्याआधी फेसबुक लाइव्ह केले होते. यामध्ये त्याने महिलेसह तिचे कुटुंबीय त्रास देत असल्याचं म्हटलं. मिनीमात नगरात राहणाऱ्या मनीष रामपाल यादव याने नदीत उडी घेत आपले जीवन संपवलं.
काय आहे नेमके प्रकरण?
मनीषचे 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेम संबंध होते. तरुणीच्या कुटुंबियांना ही बाब कळताच त्यांनी बलात्कार केल्याची तक्रार करू म्हणत पाच लाख देण्यासाठी तगादा लावला होता. सतत धमक्या आणि फोन कॉल्स याला त्रासून मनीष यादव याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करून हा सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मनिष यादवने फेसबुक लाइव्हमध्ये म्हंटले ?
फक्त पैशांसाठी माझ्याविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं चांगलं चाललं, कमाई होतेय. हे पाहून माझ्यावर बलात्काराची खोटी तक्रार दिली जात आहे. मुलीसोबत शारिरीक संबंध नव्हते तरीही तिच्या घरच्यांकडून धमकी दिली जात आहे. मुलगी, आई, वडील आणि फोटो स्टुडिओवाला मिळून मला धमकी देतायत. तू पाच लाख रुपये दे तरच तुझ्यावरची तक्रार मागे घेतो. सतत फोन करून त्रास देत आहेत. पाच लाख रुपये दिले नाहीस तर तुझ्यावरची केस मागे घेणार नाही. मला फसवत आहेत आणि मला धमक्या देत आहेत.
मी त्यांना पाच लाख रुपये द्यावेत आणि सुटका करून घ्यावी. मी जर काहीच संबंध ठेवले नसतील तर मी कशासाठी पाच लाख रुपये द्यावेत. मी एकच विनंती करेन तरुणीसह या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. माझ्या आत्महत्येनंतर कुटुंब उद्ध्वस्त होईल. याला फक्त चौघेच जबाबदार आहेत. मी माझी तीन मुलं सोडून जातोय. किमान आरोपींना शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे. पाच लाख रुपये द्या अशी सतत धमकी दिली जातेय. माझ्याकडे खिशात पाच हजार रुपये नाहीत असंही मनिष फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाला.अखेर या त्रासाला कंटाळून मनिष यादवने आत्महत्या केली.