दौंड (daund police) शहरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या बॅरेकमधून चार पोलिसांचे मोबाईल आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरट्यांनी चोरी (robbery) केली. राज्य राखीव पोलीस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी करण्यात आली आहे.
दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच मधील बॅरेक इथे तीन मार्चला रात्री 10 ते 4 मार्चला रात्री साडेबाराच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.. पोलिस बॅरेकमध्ये एकूण सात पोलीस अंमलदार होते. चोरट्याने पोलिस अंमलदार रिझवान फारुख शेख, जालिंदर भाबड, योगेश किकले आणि अक्षय चव्हाण यांचे मोबाईल संच चोरले. यासह रिझवान शेख यांची बॅग चोरली. त्या बॅगेत चार हजार रुपयांची रोकड, एटीएम कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड होते. यासह मच्छिंद्र वाघ यांचीही बॅग चोरीला गेली..राज्य राखीव पोलीस दलाचा परिसर हा बंदिस्त असून त्यांची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आहे. तरी देखील चोरट्याने बॅरेकमध्ये घुसून चोरी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडमध्ये घरफोड्या मंदिरात चोरी असे प्रकार सातत्याने घडत आहेत. मात्र राज्य राखीव पोलीस दलात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जर पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेच काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.