मालेगाव : मालेगाव तालुक्यातील आघार-ढवळेश्वर या ठिकाणी असलेल्या शिवारात पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यशवंत लक्ष्मण हिरे (वय 42) व त्यांचा लहान मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय 6) अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. या दोघांनी अजंग शिवारातील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे त्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत यशवंत हिरे यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या वेळी त्यांनी मुलगा रुद्र याला सोबत घेतले आणि शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य विकत घेऊन ते विक्रीसाठी गेले. यांनतर यशवंत यांनी अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ त्यांची पिकअप उभी केली आणि आपल्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
अशाप्रकारे उघडकीस आली घटना
या ठिकाणी बराच वेळ पिकअप उभी असल्याने परिसरातील काही नागरिकांना संशय आला. यानंतर त्या लोकांनी याची माहिती अजंग येथील पोलिसपाटीलांना दिली. यानंतर पोलीस पाटलाने याची माहिती वडनेर खाकुर्डी पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अग्निशमनदलाच्या मदतीने प्रथम यशवंत यांचा व नंतर रुद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.हे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले तेव्हा यशवंत यांनी मुलगा रुद्रला मिठी मारली होती असे काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी या पिता- पुत्राचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास वडनेर खाकुर्डी पोलिस करत आहेत.