जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जळगावातील अयोध्या नगर परिसरातील नवरात्रोत्सवच्या दांडिया कार्यक्रमात मुलांना चॉकलेट वाटप करुन घरी आल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. काल शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याने हे पाऊल उचलले. विशाल तुकाराम चौधरी (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय घडले नेमके?
अयोध्या नगरातील विशाल चौधरी हा तरुण खासगी कंपनीत कामाला होता. काल शुक्रवारी (दि.20) रात्री 8 ते 10 वाजे दरम्यान परिसरातील नवरात्रौत्सवाच्या दांडिया कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. यावेळी त्याने सर्वांना चॉकलेट वाटले. त्यानंतर ‘मला शेवटचे घरी सोडून द्या’, असे मित्रांना सांगितले. त्यावेळी एका मित्राने त्याला दुचाकीने घरी सोडले. त्यालादेखील ‘शेवटचे धन्यवाद’ असे म्हणून घरात निघून गेला. यानंतर घरात गेल्यानंतर नव्या दोरीने स्वंयपाक घरात दोरीने गळफास घेतला.
काही वेळाने त्याची पत्नी हर्षाली घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीला पाहताच त्यांना धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी धाव घेवून तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत विशाल यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी एैशिका असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशालने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे तीन वर्षाची मुलगी एैशिका वडिलांच्या मायेला पोरकी झाली आहे.