सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) कर्जबाजारी झाल्यामुळे व देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याबाबत घरामध्ये ठेवलेल्या डायरीमध्ये लिहून ठेवून एक 33 वर्षीय तरुण हा बायको व त्यांच्या तीन मुलांसह बेपत्ता झाला आहे. हे पाच जणांचे कुटुंब दि. 14 ऑगस्ट पूळुजवाडी (ता. पंढरपूर) येथून बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
सुदाम रामचंद्र यादव (रा. पुळुजवाडी ता. पंढरपूर) हे कुटुंबासमवेत राहत असून त्यांचा मोठा मुलगा तात्यासाहेब सुदाम यादव हा किराणा दुकान चालवतो. १४ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता च्या दरम्यान तात्यासाहेब यादव यांनी चार चाकी गाडीचा चालक चेतन घाडगे याला फोन करून बोलावून घेऊन आम्हाला दवाखान्यात जायचे आहे.मोहोळ येथे सोड, असे सांगितले. यानंतर तात्यासाहेब यादव यांनी घरामध्ये मोबाईलचे सिमकार्ड काढून ठेवले. तसेच मला देणेपाणी जास्त झाल्यामुळे तसेच देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे मी त्यांना कंटाळून घर सोडून पत्नी व तीन मुलांना घेऊन निघून जात आहे, असे डायरीमध्ये लिहून ठेवले.
घरच्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी तीन दिवस नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र ते घरी नाही आल्याने बेपत्ता तात्यासाहेब यादव यांचे वडील सुदाम यादव यांनी मुलगा तात्यासाहेब यादव (वय 33), सून कोमल तात्यासाहेब यादव (वय 29), मुलगी राजनंदिनी (वय 5), मुलगा यशराज (वय 4 ), तिसरा मुलगा राजकुमार (वय 2) असे एकूण पाच जण घरातून निघून गेल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. मोहोळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.