वर्धा- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा निकाल आता उद्या न्यायालय देणार आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात माहिती दिली.
आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने प्रा. अंकिता पिसुड्डे हिला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला उद्याच (10 फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण होत आहेत.
सरकारी वकील उज्वल निकल यांनी म्हटलं की, जळीतकांड प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवलं आहे. हत्येचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे. यानंतर सरकारतर्फे मी न्यायालयाला विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवलं जातं तेव्हा शिक्षा देण्याकरता एक दिवसाची मुदत, शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे, आरोपीचं म्हणणं सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी याबाबत उद्या न्यायालयात आम्ही तक्ता जाहीर करु आणि त्यादृष्टीकोनातून न्यायालय उद्या आरोपीला शिक्षा जाहीर करणार आहे.
काय आहे प्रकरण ?
प्रा. अंकिता पिसुड्डे हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते. अंकिता पिसुड्डे 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले. गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.