कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात चौघांनी आत्महत्या केल्या आहेत. एकोंडी (ता. कागल), वळिवडे (ता. करवीर), परखंदळे (ता. पन्हाळा) व तळंदगे (ता. हातकणंगले) येथे या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
काय घडले नेमके?
पहिल्या घटनेत एकोंडी (ता. कागल) येथील आकाश विलास मातीवड्ड (वय 19) हा रविवारी (ता. 22) सायंकाळी घरातून बेपत्ता झाला होता. सोमवारी (ता. 23) सकाळी नंदगाव (ता. करवीर) येथे निवृत्ती दादू चौगुले यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. परिसरातील शेतकऱ्यांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये (CPR) दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या माघारी आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
दुसरी घटना वळिवडे (ता. करवीर) या ठिकाणी घडली आहे. यामध्ये संभाजी मारुती साळोखे (वय 44) यांनी रविवारी (ता. 22) सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरी विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस (Police) चौकीत करण्यात आली आहे.
तिसरी घटना परखंदळे (ता. पन्हाळा) या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणच्या एका युवकाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 22) सायंकाळी घडली. आकाश आनंदा कांबळे (वय 29) असे त्याचे नाव आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याच्यामागे पत्नी, एक मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
तर चौथी घटना तळंदगे (ता. हातकणंगले) या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी एकाने शेतातील झाडास दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विनोद दऱ्याप्पा हरळे (वय 47, रा. मूळ गाव मोळे, ता. अथणी जि. बेळगाव. सध्या रा. कासार मळा, तळंदगे) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.