जयपूर : वृत्तसंस्था – जयपूर एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) आज पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलनेच गोळीबार (Jaipur Express Firing) केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे. मृतांमध्ये आरपीएफचा अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे.
ही ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात 4 जण जागीच ठार झाले. तर काही प्रवासी जखमी झाले. या गोळीबाराची माहिती मिळताच जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.
का केला गोळीबार?
आरपीएफ हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत राहण्यास सांगितले. परंतु रागात असलेला चेतन सिंह कोणालाही जुमानला नाही. त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार (Jaipur Express Firing) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.