कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी (Kolhapur News) जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण जण जखमी झाले आहेत. ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कार, रिक्षा आणि दोन दुचाकी यांची एकमेकांना धडक होऊन अपघात झला. या अपघातातील जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल असून नऊ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अहमदनगर येथील बिडगर कुटुंब हे जोतिबाचे दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. ज्योतिबाचे दर्शन घेऊन ते कारमधून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना आंबेवाडी येथे असलेल्या रेडेडोहजवळ सुंदर बिडगर यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पन्हाळ्याच्या दिशेने निघालेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटून रस्त्यावरून खाली पडली. धडक झाल्यानंतर कार पुढे जाऊन दोन दुचाकींना उडवत बाजूला जाऊन उलटली. या अपघातात दुचाकीवरील पंकज जाधव याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कार, रिक्षा आणि दोन्ही दुचाकींवरील 11 जण जखमी झाले आहेत.