नवी मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये देवीचं दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. या अपघातात भाविकांची गाडी नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
पेण तालुक्यातील प्रसिद्ध खरोशी येथील केळंबा देवीचं दर्शन करून येत असताना मुंबई गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत ब्रीझा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडीवरचा ताबा सुटल्यानं गाडी विरूद्ध दिशेला जावून खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणारे पाच जण पेण येथील देवीचं दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झाला आहे. जीवन पाटील आणि रमेश पाटील असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.