छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपासून लोकांमध्ये आत्महत्यांचे (Suicide News) प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाणदेखील खूप आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे अनेक शेतकरी खचून जातात आणि आत्महत्येसारखे (Suicide News) टोकाचे पाऊल उचलतात. छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
Milk Dairy : शेतकऱ्यांना दिलासा; दुधाच्या दराबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यामुळे एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली आहे. संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे.
रामेश्वर नारायण इथर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांनी वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे नऊ लाख रुपये आणि मुलगी अश्विनी हिच्या नावे पाच लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ही सगळी रक्कम एकूण 22 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. मात्र यादरम्यान पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला. यामध्ये आपले पैसे बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.